नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुदास कामत यांना भेटीची वेळ दिली. मात्र, तरीही कामत यांनी सोनिया गांधींची भेट न घेता थेट सर्वपदांचा राजीनामा दिला.


 

मुंबई पालिका निवडणूक तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुरुदास कामत, कृष्णा हेगडे आणि इतरांनी दंड थोपटले आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. त्यामुळं आता अशा गटातटात विभागलेली काँग्रेस पालिका निवडणूक कशी जिंकणार हा प्रश्न आहे.

 
पालिका निवडणुकीला अवघं वर्ष उरलं असताना मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. संजय निरुपम यांच्या कारभारावर नाराज असलेल्यांनी आवाज बुलंद केला आहे. त्यात आघाडी घेतलीय ती गुरुदास कामत यांनी.

 

नेहमीच्या आक्रमक स्टाईलमध्ये फक्त नाराजी व्यक्त करुन न थांबता कामत यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला.

 

'44 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये काम करतो आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून मी विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला आहे. 10 दिवसांपूर्वी सोनिया गांधींना भेटून मी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर पत्र पाठवूनही सोनिया आणि राहुल गांधींना निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. अखेर मी अधिकृतरित्या त्यांना कळवून काँग्रेस आणि राजकारणातून संन्यास घेतो आहे.' अशा माहिती कामत दिली.

 

कामत यांनी नाराजीचा सूर आळवल्यानंतर आमदार कृष्णा हेगडेंनीही निरुपम यांना घरचा आहेर दिला आहे. ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हणत हेगडेंनी आख्खी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.

 

निरुपम अध्यक्ष झाल्यानंतर प्रिया दत्त यांची कोंडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरु झाला. ज्यातून निरुपम समर्थक अस्लम शेख आणि दत्त समर्थक नसीम खान यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यामुळं मुंबई काँग्रेस परंपरागत देवरा गट, प्रिया दत्त यांचा गट, गुरुदास कामत गट आणि निरुपम गटात विभागली गेली आहे.

 

एकीकडे भाजप आणि शिवसेनेनं पालिकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत भांडणात गुंतली आहे. नेते नाराज आहेत, कार्यकर्ते सैरभैर आहेत. गटातटामुळं जनतेला नेमका कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाही. आता अशा स्थितीत काँग्रेस पालिका निवडणूक कशी जिंकणार? हा प्रश्न उरतो.