CM Uddhav Thackeray At Raj Bhavan : विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रपतींसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. 


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत आहे.  आपलं राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल.  50 एकरात हे राजभवन आहे.  इथली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या असाही टोला त्यांनी लगावला. 


मुख्यमंत्री म्हणाले की, या वास्तुचा जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकलं जातं मात्र इथे जपलेलं आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 


मुख्यमंत्री म्हणाले की, दरबार हॉलचे अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले आहे. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे.  एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर  आहेत.  अशी वास्तू शोधून सापडणार नाही, असं ते म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की,  ब्रिटीश गव्हर्नरचे हे चौथे निवास स्थान होते. ग्यानी झैलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना बोलावलं होतं, प्रणवदा होते त्यांनी मला भेटायला बोलावले होते. अशा अनेक आठवणी आहेत. 


वैशिष्ट्ये कायम ठेऊन नुतनीकरण करण्याचे आवाहन पेलले आहे.  आधुनिकता अंगी बाळगतांना संस्कृती जपणे, जुन्या नव्याचा समतोल साधणे गरजेचे आहे.  पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासही सज्ज झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 


राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी झाले. दरबार हॉलचे उद्घाटन 8 डिसेंबर रोजीच राष्ट्रपतींच्या हस्तेनिश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच  बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन  क्षमता 225 इतकी होती. 


जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस पदकदान समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी  तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जायचा.  इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या 1911 साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता.  त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तु रचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.   शंभर वर्षांहून अधिक काळ लाटा  व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे 2016 नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला. नव्या दरबार हॉलचे बांधकाम 2019 साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे  बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर 2021 मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha