Eknath Shinde On Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकमेकांवर हल्लाबोल केला. आपल्या भाषणात दोघांनीही आनंद दिघेंचा उल्लेख केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंद दिघे म्हणायचे एक दिवस या ठाण्याचा मी मुख्यमंत्री करणार. त्यांना माहित होतं, तुम्ही कापायला निघालात, त्यांचेही पाय कापले. रामदास भाई (रामदास कदम) मगाशी म्हणाले ते बरोबर आहे. दिघे साहेब गेल्यानंतर मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला वाटलं की तुम्ही (उद्धव ठाकरे) विचाराल की, दिघे साहेबांनी संघटना कशी वाढवली, त्यांचं काम कसं होतं. पण त्यांनी विचारलं की, आनंद दिघेंची प्रॉपर्टी किती आहे, कुणाकुणाच्या नावावर आहे. त्यांचं बँक खातंही नव्हतं. मला त्यावेळी धक्का बसला. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो मी खोटं बोलत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदारांनी विरोध केला, मी त्यांना सांगितलं, मला काही नको. पण, छातीवर दगड ठेऊन मी त्यांच्यासोबत राहिलो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती, मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला. नारायण राणे बोलले होते की, बाळासाहेब ठाकरे असते हा मुख्यमंत्री झाला नसता. तुमची लायकी तुम्ही काढताय, असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.


मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही कोणत्याही शिवसैनिकाला त्रास दिला नाही. आम्हाला कुणावरही अशा प्रकारचा अन्याय करुन प्रवेश करुन घ्यायचा नाही हे मी जाहीरपणे सांगतो. निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं, पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण आता इमोशनल ब्लॅकमेल करता येणार नाही, अशा पद्धतीने पक्ष वाढवता येणार नाही. आता राहिलेलेही आमच्यासोबत येतील.


मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे म्हणाले की,  आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचा शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे, असंही शिंदे म्हणाले. 


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे 
आनंद दिघे या एकनिष्ठ शिवसैनिकाला जाऊन आज 20 वर्ष झाली. आजवर यांना आनंद दिघे कधी आठवले नाही. आज यांना दिघे आठवत आहेत, कारण आज ते काही बोलू शकणार नाहीत. ते एकनिष्ठ होते, जातानाही ते भगव्यातून गेले, त्यांनी भगवा सोडला नाही, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.