मुंबई : गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले आहेत. यावरुन आता राजकारण तापू लागलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.


नक्षलवादी हल्ला नित्याची गोष्ट झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर लहान मोठे नक्षलवादी हल्ले झाले आहेत. मात्र आजचा हल्ला गंभीर आहे. राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही, असा आरोप शरद पवारांनी केला.



राज्यात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे आहे. नक्षलवादी हल्ले सतत होत आहेत, याचा अर्थ मुख्यमंत्री आपली जबाबदारी पार पाडायला अपयशी ठरले आहेत. जी व्यक्ती सामान्य माणसांची आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या रक्षणाची जबाबदारी घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीला या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.


सरकार नक्षलवाद्यांविरोधात ठोस पाऊल उचलण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारला पायउतार करण्याशिवाय पर्याय नाही. आपण जवानांच्या हत्या बघायच्या आहेत का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.


गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. गडचिरोलीच्या सी-60 पथकातील 25 जवान खासगी वाहनाने प्रवास करत होते. नक्षलींनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात त्यातील्या 15 जवानांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर जखमी आहेत.  स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.


शहीद जवानांची नावे


1. दयानंद ताब्रध्वज शहारे (भंडारा)
2. आग्रमण बक्षी राहाटे (यवतमाळ)
3.सर्जेराव एकनाथ खार्डे (बुलडाणा)
4. किशोर यशवंत बोबाटे (गडचिरोली)
5. संतोष देविदास चव्हाण (हिंगोली)
6. राजू नारायण गायकवाड (बुलडाणा)
7. लक्ष्मण केशव कोडाप (गडचिरोली)
8. शाहुदास बाजीराव मडावी (गडचिरोली)
9. नितीन तिलकचंद घोरमारे (भंडारा)
10. पुरणशाहा प्रतापशाहा दुग्गा (गडचिरोली)
11. प्रमोद महादेवराव भोयर (गडचिरोली)
12. तौशिब आरिफ शेख (बीड)
13. अमृत प्रभुदास भदाडे (नागपूर)
14. योगेश सिताराम हलामी (गडचिरोली)
15. अशोक जितरू वटटी (गडचिरोली)