मुंबई: मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अंधेरीतल्या सभेत हिंदीत भाषण केलं.


अंधेरी भाग हा कमर्शियल भाग म्हणून ओळखला जातो. इथं उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषण केलं.

दरम्यान या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची नक्कल करत टीका केली. पाकिस्तानचे अतिरेकी भारतात घुसून सातत्याने हल्ले करत होते. त्यावेळी मनमोहन सिंह सरकार केवळ निषेध नोंदवत होतं. मात्र मोदी सत्तेत येताच 'सर्जिकल स्ट्राईक' करुन पाकिस्तानला चपराक लगावली, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे नोटाबंदीमुळं उद्धव ठाकरेंचं नेमकं किती नुकसान झालं हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान मुंख्यमंत्र्यांनी दिलं.

याशिवाय बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यभर काँग्रेसविरुद्ध लढले, मात्र उद्धव ठाकरे काँग्रेसचं कौतुक करत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.