मुंबई : शरद पवारांनी देशाचं राजकारण करावं, द्वेषाचं नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांनी आज पुण्यातील मेळाव्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना आलेल्या धमक्या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.


मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही!

असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य काय ते बाहेर येईलच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांचं ट्वीट

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1005860601443299328

शिवसेना आणि आघाडी एकत्र आल्यास भाजपचा पाडाव : शरद पवार


शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्याचं आमंत्रणच दिलं आहे. आज रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगताना पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.  नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्द्यांवरून पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

पुण्यातल्या शिंदे विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आलेल्या धमक्या या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशयही पवारांनी व्यक्त केला आहे.