Chhagan Bhujbal मुंबई : काल ओबीसी (OBC) नेत्यांची बैठक पार पडली. यात तीन ठराव मंजूर करण्यात आले. आज सोमवारी (दि. 29) पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. तसेच मी एकटा नाही, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव आहेत, असे वक्त्यव्य त्यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. 


छगन भुजबळ म्हणाले की, काल रात्री ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. काल जे नेते उपस्थित होते ते नेते आज उपस्थित राहणार आहेत. दिवसभर कोणाची काय चर्चा आहेत. हरकती नोंदवायच्या आहेत. या संदर्भात चर्चा होणार आहे. जाहीर सभा होणार आहे. त्याचे देखील काम सुरू आहे. ओबीसी यात्रा काढायची आहे.  त्या संदर्भात देखील कमिटी नेमलेली आहे. मार्ग आणि दिवस कोणता असेल याबाबत देखील काम करण्याची तयारी सुरू आहे. 


374 जातींचे आरक्षण संपल्यात जमा झाले


छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही, असे बबनराव तायवाडे यांनी म्हटले. यावर छगन भुजबळांना विचारणा केली असता ते म्हणाले की, नसेल तर नसेल. आमच्यात 374 वाटेकरी होते. त्यांना आम्ही सामावून घेतलं होतं. आता हजार वाटेकरी आहेत. ओबीसींच्या 54 टक्क्यांमध्ये आणखी 20 ते 25 टक्के लोक घुसवले. शाहू महाराजांनी आरक्षण देताना सांगितलं होतं की, डुबले आहेत त्यांना आरक्षण द्यावे. 374 जातींचे आरक्षण संपल्यात जमा झाले असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही बोलतो. 


आरक्षण समाप्त होतंय, त्याची आग आमच्या मनात


सरकारमध्ये तुम्ही एकटे पडलात का? अशी विचारणा केली असता छगन भुजबळ म्हणाले की,  मी कसला एकाकी पडलो, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव सोबत आहेत. ओबीसीमध्ये जाणीवपूर्वक करोडो लोक बॅकडोअरने घुसवतात हे जाणीवपूर्वक आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येथे मंत्र्याचा, मंत्रिमंडळाचा, सरकारचा कसला संबंध नाही. इथे माझ्या ओबीसी समाजाचे आरक्षण समाप्त होते आहे. त्याची आग आमच्या मनात भडकते आहे, असे प्रत्युतर त्यांनी संजय राऊत यांना दिले. 


द्या ना त्यांना वेगळे आरक्षण


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, ते भेटतील तेव्हा मी सांगणार की आग कशी कमी करणार आहात. मी त्यांना सांगणार आहे की, द्या ना त्यांना वेगळे आरक्षण, कशाला आमच्यात घुसवत आहात. ओबीसी समाजातून मराठा आरक्षण द्यायला सुरुवात झाली मग थांबवा ना ते, असे भुजबळ म्हणाले. 


मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही


सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडून लढणार अशी विचारणा केली असता भुजबळ म्हणाले की, हे सरकारने आणि माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, मला त्याची चिंता नाही. मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. सरळ जाऊन सांगा तुम्ही याला काढा, असेही छगन भुजबळ म्हणाले.


आणखी वाचा 


राज ठाकरेंच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच ठाकरे गटाची सहमती; संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून मराठ्यांची फसवणूक