कल्याण : सत्ताधारी भाजपला राम मंदिराशी काही देणंघेणं नाही, त्यांना फक्त देशात पुन्हा एकदा सरकार हवं आहे, आणि त्यासाठीच चाललेले हे जुमले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तूफान टीका केली. उल्हासनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.


निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपला राम मंदिराची आठवण झाली. यावरुन भविष्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा सरकारचा डाव असल्याचं दिसत आहे, असा खळबळजनक आरोप भुजबळांनी केला. तसंच राफेल घोटाळा आणि सीबीआय महासंचालकांच्या उचलबांगडीवरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

एकीकडे हिंदुस्थान एरोनॉटिक्ससारखी सक्षम कंपनी आपल्याकडे असताना ज्यांनी कधी खेळण्यातलं विमानही तयार केलं नाही, त्या अनिल अंबानींना विमान तयार करायला सांगणं, आणि साडेपाचशे कोटींचं विमान साडेसोळाशे कोटींना विकत घेणं, याची साधी कारणंही मोदी सांगू शकत नसल्याचं भुजबळ म्हणाले.

सीबीआय महासंचालक आलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्याची चौकशी सुरु केल्यानं 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आणि त्यातूनच त्यांची उचलबांगडी झाल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. मोदी हे सर्वसामान्यांशी मन की बात करतात, पण अदानी, अंबानी यांच्याशी धन की बात करतात, अशी घणाणाती टीका त्यांनी केली.

साडेचार वर्षात मोदी सरकारने काहीही केलेलं नाही, आणि त्यामुळेच आता न मागता सरकार आपल्याला अनेक गोष्टी देईल, याचंच उदाहरण म्हणजे सवर्ण आरक्षण असल्याचं भुजबळ म्हणाले. तर हनुमानाच्या जातीवरुन अकलेचे तारे तोडणाऱ्या भाजप नेत्यांनीही भुजबळांनी चांगलीच शाळा घेतली.

या सभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री गणेश नाईक, स्थानिक आमदार ज्योती कलानी असे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते उपस्थित होते.