Bhiwandi Building Collaps:  भिवंडीतील वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे. या इमारतीच्या  ढिगाऱ्याखाली  50 ते 60 जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती देखील  समोर येत आहे. या घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली असून अग्निशमन दलाकडून बचावकार्य सध्या सुरु आहे. वर्धमान कंपाऊंडमधील ग्राउंड आणि दोन मजली इमारत दुपारी 1.45 च्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या  वरच्या मजल्यावर चार कुटुंबे राहत होती, तर काही मजूर तळमजल्यावर काम करत होते.


भिवंडी अग्निशमन विभाग आणि ठाणे महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष  यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. दोन ते अडीच तासांपासून बचावकार्य सुरु आहे. तसेच श्वानपथकाच्या मदतीने शोधकार्य देखील सुरु आहे. एनडीआरएफच्या पथकाने या ढिगाऱ्याखालून एका महिलेल्या बाहेर काढले असून तिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांमध्ये चार लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. तसेच भिवंडी, ठाणे आणि इतर आजूबाजूच्या भागातील अग्निशमन दल शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच या घटनेबद्दल अधिक तपास सुरु असल्याचं पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. 


घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, बचाव पथकाचे एक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे, तर भिवंडी अग्निशमन दलही घटनास्थळी आहे.तसेच या ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले असल्याची भिती देखील वर्तवली जात आहे. दुपारी हे मजूर काम करत होते त्याच  दरम्यान ही इमारत कोसळली. तसेच आता या मजुरांच्या नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. 


भिवंडीत गेल्या चार वर्षांत इमारती कोसळण्याच्या विविध घटनांमध्ये 58 जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीच्या पटेल कंपाऊंडमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 25 जण जखमी झाले होते. 


 


 






महत्त्वाच्या इतर बातम्या 


Crime News: 10 लाखांसाठी सुनेची हत्या, मालाड मालवणी परिसरातील धक्कादायक घटना