मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात वरीष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आरोपी करणार आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला. अन्यथा ही याचिका उगाच ऐकत बसून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका अशी नाराजी व्यक्त करत याबाबत सोमवारपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि त्याबाबतचा गोपनीय अहवाल लिक करणं यासंबंधी मार्चमध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेमुळे शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यावर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल सोमवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत हायकोर्टात दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.


बई पोलिसांनी अद्याप शुक्ला यांना आरोपी केलेले नाही


मुंबई पोलिसांनी अद्याप शुक्ला यांना आरोपी केलेले नाही. मात्र, सध्या तपास सुरू आहे असं आपल्या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी म्हटलेलं आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी हायकोर्टाला दिली आहे. जर शुक्ला यांना आरोपी केलेलं नसेल आणि त्यांना पोलीस आरोपी करणार नसतील तर याचिकेवर सुनावणी घेऊन वेळ वाया घालवणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळे जेव्हा त्यांना आरोपी केलं जाईल तेव्हा त्या पुन्हा न्यायालयात याचिका करु शकतात असेही न्यायालयानं स्पष्ट केलं.


रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे फोन टॅप केले


रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे फोन टॅप केले आणि यासंबंधी तयार केलेला गोपनीय अहवाल गैरप्रकारे उघड केला असा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. मात्र, वरिष्ठांना विचारुनच हे फोन टॅप केले होते असा दावा शुक्ला यांनी केला आहे. तसेच हा तपास सीबीआयकडे सुपुर्द करावा आणि कठोर कारवाईपासून संरक्षण द्यावे अशी मागणी शुक्ला यांनी हायकोर्टाकडे या याचिकेतून केलेली आहे.