मुंबई : प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने शुक्रवारपासून कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी प्लास्टिक बाळगणाऱ्या 6 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. या कारवाईत 22 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 95 हजार रुपयाचा दंडही वसूल करण्यात आला आहे.


या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांची धावपळ उडाली असून प्लास्टिक पिशवी त्यांना चांगलीच महागात पडणार असे दिसत आहे. पालिकेने प्लास्टिकविरोधात जोरदार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारीपासून पालिकेच्या विशेष टीमकडून प्रत्येक फेरीवाल्याची झाडाझडती घेतली जात आहे.

राज्य सरकारने 23 जूनपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात प्लास्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. असे असताना अनेक फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने फेरीवाल्यांकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास त्याला 'ब्लॅक लिस्ट' करून फेरीवाला परवाना प्रक्रियेतून बाद करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे.

या निर्णयाची जोरदार अंमलबजावणी सुरु झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी कारवाई सत्राच्या पहिल्याच दिवशी पालिकेच्या विशेष प्लास्टिक विरोधी टीमने तपासणी केली असता फेरीवाल्यांकडे आढळलेले 22 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर 95 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

35 हजार किलो प्लास्टिक जप्त
23 जूनपासून पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल 35 हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या या निरीक्षकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत प्रत्येक दिवशी 60 हजार ते एक लाखांपर्यंत सरासरी दंड वसूल करण्यात येत आहे.