ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही फेरीवाल्यांवर धडक कारवाई
मनश्री पाठक, एबीपी माझा | 14 May 2017 05:36 PM (IST)
मुंबई : ठाणे महापालिकेने फेरीवाल्यांवर धडक कारवाई करत रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ दिला. त्यानंतर आता मुंबई महापालिकाही फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे. मुंबई महापालिका फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुंबईतील स्टेशन परिसर, आझाद मैदानाजवळील फूटपाथ, फॅशन स्ट्रीट येथे महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. फॅशन स्ट्रीटवरील 40 लायसन्सधारक फेरीवाल्यांना सध्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या 40 फेरीवाल्यांना कारवाईच्या पहिल्या टप्प्यात हटवण्यात येणार आहे. अधिकृत परवाने असले तरी नियमबाह्य रितीनं स्टॉल उभारणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई अटळ मानली जात आहे. ठाण्यात फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांनी मारहाण केली. त्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल स्वत: रस्त्यावर उतरत कारवाई सुरु केली. त्यामुळे आता ठाण्यातील परिसराने मोकळा श्वास घेतला.