मुंबई : मुंबईत पावसाळ्यात मॅनहोल्स उघडी राहून त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये, अतिवृष्टीच्या काळात त्यात पडून कोणी वाहून जाऊ नये याकरता किती मॅनहोल्सना लोखंडी संरक्षक जाळ्या लावल्या आहेत? याची माहिती द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला आहे.


ही सगळी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई महापालिकेने हायकोर्टाला द्यायची आहे. यासंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान महापालिकेने ही माहिती सादर करणं अपेक्षित होतं. मात्र पालिकेचा अहवाल तयार नसल्याने त्यांनी हायकोर्टाकडून उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतली आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर 21 जूनला पुन्हा सुनावणी होणार आहे.

गेल्या वर्षी डॉ. दीपक अमरापूरकर यांचा पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूकरता मुंबई मनपा आयुक्त आणि संबंधित पालिता अधिकारी यांच्या विरोधात कर्तव्यात पार पाडण्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन या संघटनेनं दाखल केली आहे.

मार्चमध्ये या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान मॅनहोल्सना लोखंडी संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती मुंबई मनपाने हायकोर्टाला दिली होती. संरक्षक जाळ्या बसवल्याने मॅनहोल्स जरी उघडी राहिली तरी अपघाताने त्यात पडलेली व्यक्ती वाहून जाण्याचा धोका टळता येऊ शकतो.