मुंबई महापालिकेच्या या अहवालानुसार जून ते ऑगस्ट दरम्यान मुंबई महापालिकेच्या 'एमसीजीएम 24*7' या अॅपवर आणि बीएमसीच्या ट्विटरवर एकूण 2 हजार 634 खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 7 ऑगस्टपर्यंत 2 हजार 234 खड्ड्यांच्या तक्रारीचं निवारण हे मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण 84. 37 टक्के इतक्या खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
या अहवालाबाबत 'एबीपी माझा'च्या टीमने रिऍलिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या 'बी' वॉर्डमध्ये (पायधुनी, काळबादेवी परिसर) या अहवालानुसार फक्त 1 खड्डा बुजवण्याचं काम बाकी आहे. मात्र त्या ठिकाणी 8 ते 10 खड्डे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा हा अहवाल कितपत खरा आहे? हा प्रश्न आहे.
विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा सुरु झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील खड्ड्यांची संख्या जवळपास 19 हजार इतकी समोर आणली होती. त्यापैकी बीएमसीने फक्त दोन ते अडीच हजार खड्डे बुजवण्याचं काम केलं असून अद्याप मुंबईतील 16 ते 17 हजार खड्डे बुजवण्याचं काम बाकी असल्याचं महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितलं आहे.
मुंबईतील अंधेरी, चकाला, जेव्हीएलआर या भागातील खड्डे लक्षात घेता केवळ एका वॉर्डमध्ये 414 खड्डे होत असताना संपूर्ण मुंबईत 414 खड्डे असल्याचा दावा कितपत खरा हा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.