मुंबई : नोटांवरुन महात्मा गांधींचे फोटो हटवण्याची मागणी करत ट्विटरवर नथुराम गोडसेचे आभार मानल्यामुळे मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ट्वीट वादग्रस्त ठरत असल्याचं लक्षात येताच निधी चौधरींनी ट्वीट डिलीट करुन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.


'150 व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. (रडणारी इमोजी) आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावं बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. 30.01.1948' अशा आशयाचं इंग्रजी ट्वीट करुन निधी चौधरींनी सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो जोडला होता.



17 मे रोजी केलेलं आपलं ट्वीट वादाला कारणीभूत ठरत असल्याचं लक्षात येताच त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी काही ट्वीट्स केली आहेत. 'काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्वीट डिलीट केलं आहे. तुम्ही 2011 पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही'




दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निधी चौधरी यांची महापालिकेच्या सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.



कोण आहेत निधी चौधरी?

निधी चौधरी या 2012 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.



16 मे रोजी साध्वी प्रज्ञाचं वक्तव्य, 17 मे रोजी निधी चौधरींचं ट्वीट

'नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंहने 16 मे 2019 रोजी केलं होतं. विशेष म्हणजे साध्वी प्रज्ञा भाजपच्या तिकीटावर भोपाळ लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडूनही आली. मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रज्ञाने प्रत्युत्तर दिलं होतं. गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाल्याचं हासन म्हणाले होते.



सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहने माफीनामा मागितला होता. 'ते माझं वैयक्तिक मत होतं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र कोणाचं मन दुखावलं असल्यास माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं, ते विसरता येण्यासारखं नाही. माध्यमांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास' अशी पुष्टी तिने जोडली होती.

कोण होता नथुराम गोडसे?

नथुराम गोडसेने पुण्याजवळ बारामती येथे प्राथमिक शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्यावरच सोडलं. नथुराम गोडसे सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 1930 अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली त्यावेळी झालेल्या धार्मिक दंगलींमुळे नथुराम गोडसे दु:खी झाला होता. या दंगलींसाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जबाबदार मानत होता. त्यामुळेच त्याने चिडून आपल्या साथीदारांसह महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला.

त्यानुसार 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनात गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. गांधींजींच्या हत्येप्रकरमी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.