मुंबई : शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दिल्ली दौऱ्यात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंकडून करण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्याला प्राधान्य दिलेलं दिसत आहे.


पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि अन्नपुरवठा मंत्र्यांची भेट घेतली. मुंबईतल्या कोस्टल रोडला महिनाभरात सीआरझेडची परवानगी मिळणार आहे. तर रायगडसह इतर शिवकालीन गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची मुंजरी देखील फडणवीसांनी मिळवली.

बुलेट ट्रेनबाबतच्या उपसमितीत शिवसेनेच्या एकाच मंत्र्याला स्थान


शिवस्मारकाच्या भूमिपूजनावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांसमोर या दोन मागण्या केल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जाऊन त्या मागण्यांची पूर्तता केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत युतीचं सरकार यावं, म्हणून भाजपने एक पाऊल पुढे टाकल्याचं म्हटलं जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात तीन मोठे निर्णय


मुंबई महापालिकेत 82 जागा मिळवत भाजपने मुसंडी मारली असली, तरी शिवसेनेने 84 जागा मिळवत आघाडी मिळवली आहे. सेनेला अपक्ष नगरसेवकांचं बळ मिळाल्यामुळे त्यांची वाटचाल नव्वदीकडे चालली आहे. त्यातच बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेससारख्या इतर पक्षांकडूनही सेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे हा मेरु रोखण्यासाठी भाजपकडे फोडाफोडी किंवा युती असे दोनच पर्याय राहू शकतात. त्यापैकी युतीच्या दिशेने भाजपने पावलं टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.