मुंबई : ‘विधिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची वेगळी आहे. मातोश्रीमध्ये बसून आदेश सोडणं सोप्पं असतं, विधिमंडळात प्रश्नांची अधिकृत उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे आता विधावसभेचं घोडा मैदान दूर नाही, आम्ही विरोधक म्हणून महाराष्ट्राच्या न्यायहक्कासाठी गोळा बारुद घेऊन सज्ज आहोत’, असा इशारा नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. शपथविधीनंतर एबीपी माझाशी केलेल्या बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी विधानभवनात पहिल्यांदा आमदार म्हणून पाऊल ठेवणाऱ्या ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.


मला अभिमान आहे, मी ज्या पक्षाच्या आमदारकीची शपथ घेतली त्या पक्षाने कोणाची लाचारी केली नाही. जेव्हा आमच्याकडे समर्थन नव्हतं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्यासाठी आम्हाला पंचतारांकिंत हॉटेलची गरज लागली नाही. आम्ही कोणाचे तळवे चाटले नाहीत, कोणाची लाचारी पत्करलेली नाही त्यामुळेचं मला भाजपसोबत असल्याचा अभिमानच असल्याचंही नितेश राणे म्हणाले.



अजित पवारांवर विचारेलेल्या प्रश्नावर नितेश राणे यांनी, अजित दादांच्या बाबतीत त्यांचं घर तुटलं नाही यासाठी मी समाधानी असल्याचं सांगितलं. बाकी राजकारण होतच राहतं पण कुठलही कुटुंब तुटता कामा नये असेही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. मुंबईत शिवतीर्थावर उद्या (28 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याआधी 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपने स्थापन केलेलं सरकार अवघ्या 72 तासांतच कोसळलं.

Kunti Pawar on Ajit Pawar | रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार अजितदादांवर काय म्हणाल्या? | ABP Majha