मुंबई : आजचं विशेष अधिवेशन नियमाला धरून नाही. राष्ट्रगीत झाल्यानंतर विधानसभा संस्थगित होतं. अधिवेशन पुन्हा बोलवायचे असेल तर राज्यपालांचा समन्स घ्यावा लागतो. नवीन अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम् ने व्हायला हवी होती. त्याशिवाय अधिवेशन सुरू होऊ शकत नाही. आम्हाला रात्री एक वाजता अधिवेशनाबाबत निरोप आले. आमचे सदस्य पोहचू शकू नये म्हणून आम्हाला रात्री एक वाजता कळवलं का? हे अधिवेशन संविधानानुसार होत नाहीये, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. बहुमत चाचणीच्यावेळी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभात्याग केला. भाजपकडून अपक्ष आमदार महेश बालदी यांनी राज्यपालांकडे याचिका केली असल्याची माहिती देखील मिळाली आहे. कायद्यानुसार मंत्र्यांचा शपथविधी झाला नसल्याची याचिका केली. पुढील दोन दिवसात राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास कोर्टात जाण्याची देखील तयारी भाजपने केली आहे.


फडणवीस यांनी अधिवेशनावर आक्षेप घेत मला संविधान बोलणार, मला कोणी रोखू शकणार नाही, असे ते म्हणाले. नियमानुसार जर शपथ घेतली नाही तरच ती ग्राह्य मानली जात नाही. ओबामा ह्यांनी चुकीची शपथ घेतली म्हणून दुसऱ्या दिवशी घ्यावी लागली. संविधानानुसार शपथ घेतली नाही म्हणून परिचय करून देणे योग्य नाही, असे ते म्हणाले. प्रोटेम स्पीकर निवडीबाबत आक्षेप घेत ते म्हणाले की, तुम्ही सांगता हे नवीन अधिवेशन नाही, जुने नाही. देशाच्या इतिहासात प्रोटेम स्पीकर बदलला नाही, असे त्यांनी सांगितलं. एक हंगामी अध्यक्ष हटवून दुसरा हंगामी अध्यक्ष नेमण्यात आला. सगळ्या गोष्टींची पायमल्ली होते आहे. महाराष्ट्र विधान सभा इतिहासात हंगामी अध्यक्षांनी बहुमताचा प्रस्ताव मांडलेला नाही. हंगामी अध्यक्ष निवडणूक झाल्याशिवाय बहुमत प्रस्ताव येत नाही, असेही फडणवीस म्हणाले. नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू, असल्याचं ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि संसदीय प्रथांची संपूर्ण पायमल्ली या सरकारने केली आहे. 27 नोव्हेंबर रोजी जे अधिवेशन झाले, ते ‘वंदे मातरम्‘ने सुरू झाले आणि राष्ट्रगीताने सांगता झाली. याचा अर्थ ते अधिवेशन संस्थागित झाले होते. नूतन अध्यक्षांची निवड होईस्तोवर हंगामी अध्यक्ष हे कायम राहत असतात. पण या सरकारने त्यातही बदल केला. नवीन हंगामी अध्यक्ष आणले गेले. देशाच्या इतिहासात असे आजवर कधी घडले नाही. संविधानाची पूर्णतः पायमल्ली येथेही करण्यात आली. अध्यक्षांची निवड झाल्याशिवाय विश्वासमत कधीही मांडण्यात आलेले नाही. हा पराक्रम सुद्धा या सरकारने केला. भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडले. नियमबाह्य पद्धतीने सभागृह चालविण्याचा आणि दडपशाहीचा मी निषेध करतो, असे ते म्हणाले.

अधिवेशन कायदेशीर- अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

या सभागृहात अधिवेशन बोलवलं, अधिवेशन संस्थगित झाली. सात दिवसाच्या आत सभागृह बोलवत येतं. त्यामुळे राज्यपालांनी शपथविधी झाला तेव्हा बैठक झाली. काल राज्यपालांनी परवानगी अधिवेशन दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे, असे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच तुमचा मुद्दा फेटाळून लावतो, असे त्यांनी सांगितले. यानंतर भाजपचे सदस्य वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केला. दादागिरी नहीं चलेगी, यासारख्या घोषणा देत भाजप सदस्यांनी गदारोळ केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचा परिचय करुन दिला.

 बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास

महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी अखेर पार पडली. या बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास झाले आहे. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केलं. तर चार सदस्य तटस्थ राहिले. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.