मुंबई : मुंबई विद्यापीठामध्ये नवीन कुलसचिवांची नियुक्ती केल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनांची तयारी सुरु असतानाच राज्य शासनाने विद्यापीठामध्ये नवीन कुलसचिवांची परस्पर नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरुंनी प्रभारी कुलसचिव नेमला असतानाही व कोणतीही अनागोंदी नसतानाही राज्य सरकारने विद्यापीठात पुन्हा ढवळाढवळ केली असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.


कुलगुरुंनी 14 जानेवारीला राज्य सरकारला पत्र लिहून नॅक मूल्यांकन असल्याने आता कुलसचिव बदलल्यास त्याचा मूल्यांकनावर परिणाम होईल हे सांगितल्यावर देखील सरकारने विद्यापीठावर मनमानी करून कुलसचिव थोपला. या बदलाचा नॅक मानांकनावर परिणाम झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. विद्यापीठांचे सरकारी महामंडळ करण्याच्या दिशेने वाटचाल चालली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सरकारी हस्तक्षेप नको असेच म्हटले आहे. मात्र, अहंकारी ठाकरे सरकारने मनमानी सुरुच ठेवली आहे. हा विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला आहे, असे गंभीर आरोप आमदार अॅड आशिष शेलार यांनी केले आहेत.


राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांची स्वायत्ता अशीच धोक्यात आली आहे. उच्च शिक्षणमंत्री यांनी पदभार घेताच विद्यापीठांकडे आर्थिक हिशेब मागितले होते, त्याला विरोध होताच सारवासारव करण्यात आली. त्यानंतर युजीसी, विद्यापीठ, कुलपती, कुलगुरू, सीनेट यांना डावलून सरकारने अंतिम वर्षे परिक्षा रद्द करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. त्यालाही विरोध झाला व न्यायालयाने, युजीसीने फटकारल्यानंतर परिक्षा घ्याव्या लागल्या होत्या. ठाकरे सरकारचा हा कारभार विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा, स्वायत्ता याला इजा करणारे आहे. आता आपल्या मर्जीतील कुलसचिवांच्या नियुक्त्या करुन विद्यापीठांवर सरकारने ताबा मिळवला आहे. विद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या या निर्णयाला आम्ही याला विरोध करतो. आम्ही संघर्ष करु, असा इशारा ही आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिला आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI