शिवसेना - 14 आमदार × 4 = 56
भाजप - 15 आमदार × 4 = 60
शिवसेना + भाजप = 56 + 60 = 116
उरलेल्या जागा = 227 - 116 = 111
या उरलेल्या जागा पुन्हा 50:50 कराव्यात की विधानसभेत झालेल्या मतदानाच्या पॅटर्नवर ठरवाव्यात यावर आजच्या बैठकीत खल होईल. शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंनी खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि शिवसेना उपनेता रवींद्र मिर्लेकर यांची निवड केली आहे. तर ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना युतीच्या चर्चेपासून दूर ठेवण्यात आल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मंत्र्यांची असमाधानकारक कामगिरी आणि शिवसैनिकांमधली वाढती नाराजी पाहता उद्धव ठाकरेंनी ज्येष्ठ मंत्र्यांना डावलून 'ग्राऊंड वर्क' करणाऱ्यांना संधी दिल्याचं म्हटलं जातं आहे. अनिल परब - अनिल परब यांच्यावर पश्चिम आणि पूर्व उपनगरातील वॉर्डची जबाबदारी आहे. वकील असल्याने उमेदवारी अर्ज भरून घेणं, निवडणुकीच्या आचारसंहितेची नियमावली आणि कायदेशीर बाबी तपासून उमेदवारी अर्ज बाद होऊ न देण्याची जबाबदारी परब यांच्यावर असेल. रवींद्र मिर्लेकर - मिर्लेकर यांच्यावर दक्षिण आणि मध्य मुंबईची जबाबदारी आहे. जुन्या फळीतील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून मिर्लेकर यांची ओळख आहे. मिर्लेकर माजी विधानपरिषद आमदार, नाशिक आणि जळगाव सांपर्कप्रमुखाची जबाबदारी पार पाडली आहे. गिरगावमध्ये राहणारे आणि दक्षिण मुंबईचा वॉर्डनिहाय मतदारांचा अभ्यास असलेल्या मिर्लेकर यांना शिवसेनाच्या प्रशासकीय कामचा चांगला अनुभव आहे. अनिल देसाई - युतीच्या चर्चेत वाटाघाटी करण्याचं आणि भाजप - शिवसेनेतील प्रमुख दुवा असण्याची जबाबदारी अनिल देसाईंवर आहे. शिवसेनेचा चिलखती किंवा व्यूहरचना आखणारा चेहरा म्हणून अनिल देसाई ओळखले जातात. अतिशय शांत, संयमी दिसणारा मात्र चाणाक्षनीतीने धोरण राबवणारा नेता. बँकेच्या नोकरीचा अनुभव असल्याने अंकगणितावर चांगली पकड. बार्गेनिंग आणि वाटाघाटीमध्ये तरबेज असल्याचं म्हटलं जातं.