भिवंडी : भिवंडीमध्ये रविवारी रात्री तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेती मृतांचा आकडा 41 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 25 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी (20 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. गेल्या 50 तासांपासून बचावकार्य सुरुच आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड येथील ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना रविवारी घडली होती. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. महत्त्वाची बाब म्हणजे मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलं आहेत. आता या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 37 वर पोहोचला आहे.


भिवंडीत घडलेल्या इमारत दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या निर्देशानुसार मयतांना 5 लाख रुपये तर जखमींचा मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.


पाहा व्हिडीओ : भिवंडी इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली 10 तास संघर्ष, खालिदची जगण्यासाठी धडपड



इमारत लीगल असल्यास मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत : विजय वडेट्टीवार


भिवंडीतील इमारत दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आपत्ती मदत पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला तसेच येथील मनपा आयुक्त पंकज आशिया आणि प्रांत अधिकारी तसेच एनडीआरएफ टीमच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. इमारत कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेतलं. वडेट्टीवार यांनी सांगितले की, 'जर ही इमारत लीगल असेल, तर मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल. तसेच जखमींना पन्नास हजार रुपये देखील जाहीर करण्यात आले आहेत. शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. मात्र 35 वर्षात खरंतर इमारत कोसळायला नको होती, परंतु इमारत कोसळली आहे. त्यामुळे नोटीस देऊन देखील त्यांनी इमारत रिकामी का केली नाही? याचीही चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार येईल.', असं त्यांनी सांगितलं.


इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग असल्याने त्याच्या व्हायब्रेशनमुळे हा प्रकार घडला नाही ना किंवा या इमारतीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने इमारत कोसळली आहे का? या सर्व गोष्टींची चौकशीही केली जाईल. भिवंडी इमारत दुर्घटना संदर्भात कॅबिनेटमध्ये बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल. सध्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.