मुंबई : लोअर परळमधील ना.म जोशी मार्गावरील  बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांना पुनर्विकासाच्या कामासाठी घरे स्थलांतरित केलं आहे. अशा 260 रहिवाशांना म्हाडामार्फत 15 मार्च 2020 रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये नवीन घरे दिली जावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बीडीडी चाळीसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.


ना.म.जोशी मार्गाच्या बीडीडी चाळीतील 800 पैकी 260 रहिवाशी पहिल्या टप्प्यात ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित रहिवाशांनी अजून घरे रिकामी केली नाहीत. जे 260 रहिवाशी घरे रिकामी करुन ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये स्थालांतरित झाले, त्यांच्यासाठी सोडत काढून त्यांना  अॅग्रिमेन्टसह नवीन घरे द्यावीत, असे केल्याने उर्वरित रहिवाशांमध्ये विश्वास निर्माण होऊन ते घरे रिकामी करतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून हाताळला जावा आणि कामाला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पुढे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, बीडीडी चाळीत राहत असलेल्या रहिवाशांमध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत, त्यांनाही ट्रान्झिक्ट कॅम्पमध्ये स्थलांतरित करावे. या कामासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या नियुक्तीसह स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. सर्व 800 रहिवाशी स्थलांतरित होताच तातडीने पुनर्वसनाचे काम सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाप्रमाणेच नायगाव, शिवडी आणि वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला वेग द्यावा, टप्प्यांची निश्चिती करून येथे देखील काम सुरु केले जावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री सचिन अहिर, यांच्यासह मुख्यसचिव अजोय मेहता व सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.