मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरुन सुरु असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मागे घेतली आहे. हे प्रकरण पुढे नेण्याची इच्छा नसल्याचे जयदेव ठाकरेंनी स्पष्ट केलं.


वाद नेमका काय होता?
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जयदेव ठाकरे यांनी त्यांच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवला होता. मृत्यूपत्रावरील स्वाक्षरीच्या तथ्यतेवर जयदेव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. बाळासाहेबांचं मृत्यूपत्रावर त्यांची स्वत:ची सही नव्हती. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची संपत्ती हडपल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

अखेरच्या दिवसात बाळासाहेब आजाराने जरजर झालेले होते. त्यामुळे मृत्यूपत्रावर सही करणं शक्य नसल्याचं जयदेव यांचं म्हणणं होतं. त्यामुळे संपत्तीवरुन ठाकरे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला होता.

उद्धव ठाकरे यांच्या माहितीनुसार बाळासाहेबांची संपत्ती ही केवळ 14.85 कोटी रुपयांची आहे. तर जयदेव यांच्या म्हणण्यानुसार सध्या उद्धव राहत असलेलं मातोश्री निवासस्थानच 40 कोटीचं आहे. याशिवाय बाळासाहेबांची अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता होती, ज्यांचा उल्लेख मृत्यूपत्रात नाही.

सुनावणीदरम्यान जयदेव काय म्हणाले?
सुनावणी दरम्यान जयदेव यांनी काही गौप्यस्फोट केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली होती. 'बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते. ही बाब खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितली. मात्र त्यावरुन उद्धव आणि माझ्यात वाद नको म्हणून उद्धव यांच्याकडे त्याबाबत वाच्यता न करण्याचेही त्यांनी मला सांगितले होते. परंतु त्याआधीच म्हणजे 2011 मध्ये उद्धवने काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. ती कागदपत्रे कशाबाबत होती हे खुद्द बाळासाहेबांनाही माहित नव्हतं," असं जयदेव ठाकरे यांनी सुनावणीदरम्यान हायकोर्टात सांगितलं.