कानपूर IITमधून बेपत्ता अक्षय कांबळे अखेर सुखरुप परतला
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2018 11:52 AM (IST)
कानपूर आयआयटीमधून बेपत्ता झालेला अक्षय कांबळे अखेर तीन महिन्यांनी सुखरुप घरी परतला
बदलापूर : कानपूर आयआयटीमधून बेपत्ता झालेला अक्षय कांबळे अखेर तीन महिन्यांनी सुखरुप घरी परतला आहे. काल रात्रीच्या सुमारास अक्षय बदलापूरच्या घरी आला. सध्या तो मानसिक धक्क्यात असल्याचं त्याच्या कुटुंबीय सांगत आहेत. अक्षय कानपूर आयआयटीमध्ये तृतीय वर्षांत शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी अक्षय कानपूरहून मुंबईला यायला निघाला होता. तेव्हापासून अक्षयसोबतचा संपर्क होत नव्हता. अक्षयचा शोध घेण्यासाठी त्याच्या वडिलांनी कानपुर पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मदत मागितली होती. पण त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी कानपूर आयआयटी गाठले. यानंतर संस्थेच्या माध्यमातून स्थानिक पोलीस ठाण्यात अक्षय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, याचा तपास पुढे सरकत नव्हता. वडिलांनी सतत पाठपुरवठा केल्यानंतर तपासात अक्षयच्या मोबाइलचे स्थान शोधण्यात आले. दोन सफाई कामगारांकडे अक्षयचे दोन सिम कार्ड सापडले, तर एक स्मार्टफोन एका मित्राकडून मिळवला गेला. पण तरीही त्याचा शोध लागला नव्हता. त्यामुळे काही शक्यता वर्तवल्या जात होत्या. अखेर तीन महिन्यांनी धुळवडीच्या दिवशी तो परतला. पण तीन महिन्यात नेमकं त्याच्यासोबत काय झालं, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीय. अक्षय जबरदस्त मानसिक धक्क्यात असून काहीही बोलत नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.