भिवंडी : जीर्ण झालेली इमारत, तुटक्या खिडक्या, गंज चढलेली दारं, मोडक्या खूर्च्या आणि अस्वच्छतेनं गाठलेला कळस. ही स्थिती आहे भिवंडीतल्या मिनाताई ठाकरे नाट्यगृहाची. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी खर्चून अभारण्यात आलेल्या या इमारतीची अवस्था आज अतिशय भकास झाली आहे.


विशेष म्हणजे, या नाट्यगृहात सध्या माणसांऐवजी उंदरांचाच सुळसुळाट झाल्याचं चित्र आहे. मनपा प्रशासनाची सर्व सोईंनी सुसज्ज अशी इमारत असतानाही, मनपा अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे या इमारतीची दुरावस्था झाली आहे.

वास्तविक, या नाट्यगृहाच्या देखभालीसाठी सात सफाई कामगार, तीन इलेक्ट्रिशन, दोन कार्यलयीन कर्मचारी आहेत. शिवाय नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी आजवर कोट्यवधी रुपयेसुद्धा खर्च करण्यात आले आहेत. पण तरीही आज नाट्यगृहाची अवस्था आज अतिशय भीषण झाली आहे.

दरम्यान, या नाट्यगृहाला पुन्हा सुगीचे दिवस यावेत, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सातत्याने सांगितले जाते. पण अपूऱ्या निधीचं कारण देत, पालिका अधिकाऱ्यांकडून वेळ मारुन नेली जाते. त्यामुळे नाट्यगृहाची बकाल अवस्था होईमपर्यंत, मनपा प्रशासन झोपलं होतं का? असा प्रश्न संतप्त भिवंडीकर विचारत आहेत.