कल्याण : महाराष्ट्र एटीएसने नक्षली संघटनेशी संबंधित असणाऱ्या 7 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. कोरेगाव-भीमा आणि महाराष्ट्र बंदवेळी राज्यात झालेल्या हिंसाचारात त्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व जण सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित आहेत.


या सर्वांकडे आक्षेपार्ह लिटरेचर तसेच बॅनर आढळून आले आहेत. कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी राज्यात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या आणि सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान करण्यात आलं होतं. खाजगी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती.

या सर्व घटनांमध्ये या संघटनेचा किंवा या सात जणांचा हात होता का, याचा तपास आता एटीएसकडून केला जात आहे.

कल्याण स्टेशनला हा संशयित येत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. एटीएसने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नाही. सविस्तर चौकशीनंतर या संशयिताने सर्व बाबींचा खुलासा केला.

कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि विक्रोळी भागात राहणारे आपले सहकारी सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसाठी काम करत असल्याचं या संशयिताने सांगितलं. त्यानंतर एटीएसने सर्व ठिकाणी शोध घेत एकूण सात जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सीपीआय (माओ) या संघटनेशी संबंधित कागदपत्रही मिळाली आहेत.