मुंबई: आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंची आता बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या DG TS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. समीर वानखेडे हे सध्या डीजीएमआरए पदावर कार्यरत आहेत.


केंद्र सरकारच्या वतीने आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये समीर वानखेडे यांची चेन्नईच्या डीजीटीएस पदी बदली करण्यात आली आहे. हे पद अडगळीचं किंवा साईड पोस्टिंग असल्याचं समजलं जातंय. 


आर्यन खान प्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका
समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणी चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या चुकीच्या तपासाबद्दल त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. या तपासाची जबाबादारी एनसीबीचे उपसंचालक जनरल संजय सिंह यांना सोपवण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, या एसआयटीने आपल्या तपासादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर लक्ष दिलं. ज्यात अटकेच्या वेळी आर्यन खानकडून अंमली पदार्थ जप्त झाला होता का? तो ड्रग्ज सिंडिकेटचा सदस्य होता का? अटकेच्या वेळी त्याला एनडीपीएस कायदा लागू होता की नाही? अटकेच्या वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नियम पाळले गेले होते की नाही? या मुद्द्यांचा समावेश होता.


SIT च्या अहवालात काय म्हटलंय? 
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एसआयटीच्या तपासात ज्या महत्त्वाच्या मुद्यांवर तपास करण्यात आला, त्यावरुन आर्यन खान दोषी आढळला नाही. त्यानंतर एसआयटीने पुराव्यांअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली, पण सोबतच तपास अधिकाऱ्यांवर कठोर टिप्पणीही केली. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एसआयटीने दिलेल्या अहवालाचा केंद्र सरकारने सखोल अभ्यास केल्याचे सूत्रांनी सांगितलं.


वानखेडे यांच्याकडून अनेक चुका : SIT च्या अहवालात उल्लेख
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून अनेक तांत्रिक चुका झाल्या असल्याचं या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर आर्यनसह सहा जणांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल करता येईल, असं ठोस आणि पुरेसे पुरावे या प्रकरणात मिळालेले नाहीत. एसआयटीच्या अहवालाची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


काय आहे प्रकरण?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी या सहा जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी आता केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.