मुंबई :  मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केलं. तसंच त्यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशयही विरोधकांनी व्यक्त केला. परंतु सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे. वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी मनसुख यांचा मृतदेह कळवा खाडीत मिळून आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या स्टेटमेंटनुसार एटीएसनं अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणाचाही गुन्हा दाखल केला आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार  सचिन वाझे यांना सोमवारी दुपारी एटीएस  कार्यालयात बोलावलं होतं. तिथं त्यांना  20 जिलेटिनसह मिळालेल्या स्कॉर्पियो प्रकरणाविषयी प्रश्न केले गेले. या प्रकरणात वाझे तपास अधिकारी होते.  मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या स्टेटमेंटमध्ये एपीआय सचिन वाझे यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी त्यांनी चौकशी करु शकतात.  दरम्यान पत्रकारांशी बोलताना सचिन वाझे म्हणाले की, सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. अशा प्रश्नांची उत्तरं इथं देऊ शकत नाही. ते म्हणाले की, जे आरोप माझ्यावर लावण्यात आले आहेत. ते मी वाचलेले नाहीत. मी ते वाचून उत्तर देईल. 


ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचं आयुष्यचं बदलून गेलं..


देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात बोलताना म्हटलं की, "आज सभागृहात मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. मनसुख हिरेन यांची गाडी स्फोटकं ठेवण्यासाठी वापरली, ती गाडी नोव्हेंबरपासून 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असं त्यांच्या पत्नीने स्पष्टपणे सांगितलं. इतकंच नाही तर याप्रकरणाचा तपास केवळ सचिन वाझे यांनी केला. तीन दिवस ते रोज सचिन वाझेंसोबत जायचे आणि रात्री यायचे, हे देखील पत्नीने सांगितलं. माध्यमांनी मनसुख हिरेन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर आणलं. त्यांच्या पत्नीने सांगितलं, ते पत्रही स्वत: सचिन वाझे यांना वकिलांकडे देऊन पाठवायला लावलं. एवढंच नाही सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही दोन तीन दिवस अटक व्हा, मग मी बाहेर काढतो, असंही सांगितलं. माझ्या पतीचा खून सचिन वाझेंनी केला, असा जबाब पत्नीने दिला आहे." 


सचिन वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी
फडणवीस पुढे म्हणाले की, "मनसुख हिरेन यांचं शेवटचं टॉवर लोकेशन हे गावडे यांच्या प्रॉपर्टीवर दिसतं. गावडे हे 2017  च्या खंडणीच्या प्रकरणात गावडे आणि सचिन वाझे या दोघांना एकत्रित आरोपी केलं होतं. या दोघांना अंतरिम जामीन मिळाला आहे. म्हणजे गावडे आणि वाझे एकत्र होते याचा हा भक्कम पुरावा आहे. हिरेन गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात जी वसईत आहे आणि त्यानंतर रेतीबंदरला त्यांचा मृतदेह मिळतो, सरळसरळ अर्थ असा आहे, त्यांची हत्या झाली आहे. एवढे भक्कम पुरावे असताना, आमची मागणी एवढीच होती की सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे मुंबईचे प्रमुख आहे. ते पदावर असताना त्यांना पुरावे नष्ट करण्याचे संधी आहे, रिसोर्सेस आहेत. एटीएसजवळ एवढ्या बाबी असताना त्यांना त्यांना पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचं जी गाडी वापरली ती त्यांच्याकडे चार महिने होती, मनसुख हिरेनला ओळखत होते हे लपवले, त्यामुळे त्यांना तात्काळ अटक व्हायला हवी."



सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे
राज्य सरकार पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना वाचवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, "आमच्या लक्षात आलं, सचिन वाझेंना बाजूला केलं तर अनेकांची नावं समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो, त्यावेळी गृहमंत्र्यांनी कबुल केलं त्यांना हटवण्याचं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याबाबत बदलले. सचिन वाझेंना पदावरुन दूर करणार नाही अशाप्रकारची भूमिका सरकारने घेतली. आमचा स्पष्ट आरोप आहे सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. याचं कारण काय हे शोधण्याची गरज आहे. याच्या पाठीमागे कोण कोण आहे, सचिन वाझे कोणाकोणाची नावं सांगेल, या भीतीने सरकार पाठिशी घालत आहे. यामध्ये अनेकांची नावं समोर येत आहेत. हे सरकार पूर्णपणे उघडं पडलं आहे.