मुंबई : पोलीस निरिक्षक आश्विनी बिद्रे प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अभय कुरुंदकर याचा ड्रायव्हर कुंदन भंडारी याला पोलिसांनी कांदिवलीमधून अटक केली आहे.


अश्विनी बिद्रेंना गायब करणाऱ्या अभय कुरुंदकरला मदत केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. कुंदनच्या अटकेमुळे या केसच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

अभय कुरुंदकर याच्या कॉल डिटेल्सवरुन कुंदनला अटक करण्यात आली. कुंदन हा अभय कुरुंदकरचा खासगी ड्रायव्हर होता. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



नेमकं प्रकरण काय?

15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलीस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी तिला बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या तपासात पोलिसच त्यांना सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. याचदरम्यान त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरिक्षक पद मिळालं.

एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय

पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.



अश्विनी आणि अभय यांच्यात वाद

यावेळी अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र, त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलीस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर हे तात्काळ रजेवर गेले होते. मात्र, हे संपूर्ण प्रकरण मीडियात आल्यानंतर पोलिसांनी अभय कुरुंदकरला अटक केली होती.

संबंधित बातम्या:
बेपत्ता API बिद्रे प्रकरण: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर निलंबित

बेपत्ता API बिद्रे प्रकरण: कळंबोली, जळगाव आणि सांगलीतून धरपकड

घराला नवा रंग, कुरुंदकरांनी बिद्रेंचा घातपात केल्याचा संशय

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी कुरुंदकर अटकेत

बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण