स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज : अमित शाह
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2017 07:38 PM (IST)
ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज असल्याचे गौरवोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काढले. 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचं उद्घाटन ठाण्यात हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. सावरकर हे बहुआयामी व्यक्तीमत्त्व असल्याचं सांगून अमित शाह म्हणाले की, ''सावरकर हे गद्य आणि पद्य अशा दोन्हीमध्ये श्रेष्ठ होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे येणाऱ्या पिढ्यांना दिशा दाखवण्याचे काम केलं. त्यामुळे त्यांची जे लोक निंदा करतात, त्यांनी एकदा तरी सावरकर वाचवे, म्हणजे त्यांना कळेल.'' अमित शाह यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली. अमित शाह म्हणाले की, ''सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्यांना, भविष्यात पिढ्या कधीच माफ करणार नाहीत. अटलजींच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अंदमानमध्ये सावरकर ज्योती सुरु केली. पण कर्मदरिद्री यूपीए सरकारने ही ज्योती बंद केली. पुन्हा भाजप सरकार सत्तेत आल्यावर मी स्वत: ही ज्योत पुन्हा प्रज्वलित केली. सावरकरांच्या नावाने सुरु केलेली ही ज्योत नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे.'' सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावी, अशी मागणी या संमेलनाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर अमित शाह म्हणाले की, ''संपूर्ण भारतीयांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी दिली. त्यासाठी कशाचेही काही करावे लागले नाही.'' ''सावरकरांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ते केवळ साहित्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांचे विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार संपूर्ण देशाला कळावेत,'' असं सांगून साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हे साहित्य सम्मेलन केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशातही भरावे, अशी मागणी यावेळी केली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. सावरकर साहित्य संमेलन हे तीन दिवस चालणार आहे.