मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांमध्ये काल उशिरा रात्री सह्याद्री अथितीगृहावर बैठक पार पडली. तब्बल अडीच तास या बैठकीत खलबतं झाली. तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळण्यावर या बैठकीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या दौऱ्याचं आयोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर भाजपचं नेतृत्व जोमानं कामाला लागलं आहे.

तब्बल अडीच तास या बैठकीस यावेळी मुख्यमंत्र्यासह केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, आशिष शेलार हे महत्वाचे नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकत्रित भोजनही घेतलं.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवार राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. विशेषत: तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबद्दल तूर्तास तरी पक्षाने जाहीर वाद टाळत सामोपचाराने भूमिका घेण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. त्यासोबतच लोकसभा मतदारसंघांबाबतही विभागवार चर्चा झाली.

इतर राज्यातील ग्रामीण भागात भाजपला निवडणुकीत बसत असलेला फटका, राज्यातील दुष्काळी परिस्थती, तसेच मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड या राज्यातील काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी विषयी या बैठकीत चर्चा झाली.

राज्य आणि केंद्र सरकाराने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याविषयीही सर्वोतपरी प्रयत्न केले जावेत. तसेच विरोधकांच्या टीकेला आक्रमकपणे उत्तर देण्याचेही या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली असून बैठकींचे सत्रही वाढले आहे. लोकसभेत राज्याच्या 48 जागा असल्यानं राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र भाजपकरता महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कालच मुंबई पुण्यात मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन एकप्रकारे निवडणुकींचं बिगूल फुंकलं आहे. आज मुख्यमंत्री भाजप आमदारांची बैठक घेत राज्यभरातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार आहेत.