गटाराच्या पाण्यात भाज्या धुतानाचा व्हिडीओ व्हायरल, अंबरनाथ रेल्वे स्थानकातील प्रकार
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2019 01:53 PM (IST)
यापूर्वी रेल्वे रुळांशेजारी नाल्याच्या पाण्यावर शेती केली जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले होते. आता थेट रेल्वे स्टेशनसारख्या गजबजलेल्या ठिकाणी हे विक्रेते गटाराच्या पाण्यात भाज्या धूत असल्याचं उघड झालं आहे.
अंबरनाथ : एकीकडे गटाराच्या पाण्यावर सर्रासपणे शेती केली जात असतानाच आता गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाजूने छोटा नाला वाहतो. या नाल्याच्या कडेला बसून दोन जण मुळे धूत होते. हा प्रकार प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये चित्रित केला आणि हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. यापूर्वी रेल्वे रुळांशेजारी नाल्याच्या पाण्यावर शेती केली जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले होते. आता थेट रेल्वे स्टेशनसारख्या गजबजलेल्या ठिकाणी हे विक्रेते गटाराच्या पाण्यात भाज्या धूत असल्याने या गटार भाजी माफियांची हिंमत चांगलीच वाढल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत अंबरनाथ रेल्वे स्थानकातील अधिकारी आणि रेल्वे पोलिस मात्र अजूनही अनभिज्ञ आहेत. अशाप्रकारे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे.