मुंबई : आपल्या मिश्किल भाषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शिवसेनेला चांगलाच टोला हाणला. शिवसेनेने विरोधकांशी हातमिळवणी करावी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर करावा, असा प्रस्ताव अजितदादांनी सेनेपुढे ठेवला आणि विरोधकांच्या बाकांवर एकच हशा पिकला.


काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून 145 च्या मॅजिक फिगरचे गणित जमवू आणि शेतकऱ्यांना सरसकट थेट कर्जमाफी देऊ, अशी आकड्यांची मांडणी करतच अजित पवारांनी शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर दिली. ते विधानसभेत कर्जमाफीवरील चर्चेदरम्यान बोलत होते.

मुंबई महाराष्ट्राची आहे. मुंबई अडचणीत असते, तेव्हा महाराष्ट्र मदतीला धावतो. मग आता मुंबईने शेतकऱ्यांना मदत करावी, असं आवाहन अजित पवारांनी शिवसेनेसह मुंबई महापालिकेला केलं. शिवाय, शिवसेनेला खरंच शेतकाऱ्यांविषयी सहानुभूती असेल, तर पालिकेच्या 60 हजार कोटींच्या ठेवी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी द्याव्यात, असं आव्हान यावेळी अजित पवारांनी शिवसेनेला दिलं.

अजित पवार यांनी याआधीही मुंबई महापालिकेच्या 60 हजार कोटी रुपयांच्या ठेवी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देण्याबाबत जाहीर आवाहन केलं होतं. मात्र, शिवसेनेकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.