Ajit Pawar On Mask : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मास्क वापराबाबत किती सतर्क असतात हे सर्वांनाच माहित आहे. आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा करुन मास्क ऐच्छिक केला आहे. या घोषणेनंतर अनेकांनी मास्क काढून फेकला आहे. असं असलं तरी अजित पवार मात्र अजूनही मास्कचा नियम काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत. सोबतच त्यांनी मास्क वापराबद्दलही महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मास्क ऐच्छिक केला. तरी पण आपण काळजी घेऊन मास्क घातला पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. पहिली लाट, दुसरी लाट आपण पाहिली आहे. अशा लाट पुन्हा येऊ नये, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, निरोगी महाराष्ट्रचा संकल्प आपण आज करतोय.  कोरोनामध्ये हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचे आहे हे जगाला कळलं.  सगळ्या सहकाऱ्यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं. अलीकडच्या काळात सवयी लोकांच्या बदलल्या आहेत. आज सुद्धा मुंबईत काही रुग्ण आढळले आहेत.  आपण काळजी घेऊन मास्क घातलं पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले. 


सध्या समाजात तेढ वाढवणे, दरी पाडण्याचं काम सुरू
यावेळी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या समाजात तेढ वाढवणे, दरी पाडण्याचं काम सुरू आहे. वास्तविक महागाई तसच इतर समाजिक प्रश्न याकडे लक्ष दिले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
 
नेते किंवा पक्ष बदनाम होईल असं काही कृत्य करु नका


नेते किंवा पक्ष बदनाम होईल असं काही कृत्य करु नका. नवीन आलेले आणि जुने असलेले कार्यकर्ते एकत्र काम करा.  सुनील शेळके मावळमध्ये असताना मी त्यांना उमेदवारी जाहीर केली होती.  मावळची जागा काही कारणास्तव जिंकता येत नव्हती. मात्र सुनिल शेळके यांच्या माध्यमातून जिंकता आली. उमेदवार कोणत्या जाती धर्माचा हे इथं पाहिलं जात नाही. आर आर पाटील यांचं उदाहरण आहे.  ते सर्वसामान्य कुटुंबातील आलेले असताना त्याना गृहमंत्री पदापासून ते अनेक मोठं पद देण्यात आली, असंही पवार म्हणाले. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha