मुंबई: यापुढे 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवणार नाही, असं अजित पवार यांनी जाहीर केलं.


यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवले होते. त्याबाबत विचारणा व्हायची. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं अजित पवार म्हणाले.

आमचं मुख्यमंत्र्यांसोबत भांडण नाही, कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जाणे ही आपली संस्कृती आहे, मात्र त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बोलावणार नाही, असं अजित पवारांनी नमूद केलं.

अनिकेत कोथळीची घटना दुर्दैवी

सांगली पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेची घटना सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी आहे. सरकारला पोलीसांवर अंकूश ठेवता येत नसेल तर जनतेने कोणाकडे पाहायचे, असा सवाल अजित पवारांनी केला.

या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहोचतात. एवढ्या टोकाला पोलीस कसे पोहचू शकतात. आपण कोणतेही प्रकरण दाबू शकतो हा गर्व पोलींसाना झाला आहे, त्याला दाबला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.