कल्याण: ‘राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ही घोषणा फोल ठरली असून सरकारमध्येच याबाबत गोंधळाची परिस्थिती आहे.’ अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. ते आज कल्याणमध्ये बोलत होते.


सरकार तीन वर्षात पूर्ण अपयशी ठरलं असून राज्यातला कुठलाही घटक सध्या समाधानी नसल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही बोचरी टीका केली. ‘शिवसेनेची अवस्था म्हणजे दोन तोंडाच्या गांडुळासारखी झाली आहे. दिवसा मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकत्र बसून निर्णय घ्यायचे आणि संध्याकाळी त्याच निर्णयाला विरोध करायचा. अशा धरसोड वृत्तीमुळेच १९५ आमदारांचा पाठिंबा असूनही ३० वर्षातलं हे सगळ्यात दुर्बल सरकार आहे.’ अशी टीका अजित पवार यांनी केली.

दरम्यान, समृद्धी महामार्गाबाबत बोलताना त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला. ‘या महामार्गाला लागून असलेल्या अनेक जमिनी आयएएस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी आधीच खरेदी करून ठेवल्या आहेत.’ असंही यावेळी पवार म्हणाले.