मुंबई : शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला. यापुढे स्वबळावर लढायचं, जिंकायचं आणि एकहाती सत्ता आणायची, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं.


मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

आतापर्यंत आपण स्वतःची ताकद कधी आजमावून पाहिलीच नाही. पण यापुढे स्वबळावर लढायचं, जिंकायचं आणि एकहाती सत्ता आणायची. त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. तुमच्या इतकेच परिश्रम करण्याची माझी तयारी आहे, किंबहुना तुमच्यापेक्षाही जास्त कष्ट करण्याची माझी तयारी आहे. आजपासूनच कामाला लागा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पालघर निवडणुकीच्या वेळी अख्ख्या देशाचं लक्ष शिवसेनेकडे लागून राहिलं होतं. पण आपण पाहिलं की बाकीचे चीटिंग करुन जिंकले, मात्र नैतिक विजय आपलाच झाला, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

आपण कुठे होतो आणि कुठे आलो आहोत, ते आपल्याला माहित आहे. 52 वर्षांत कसं झगडावं लागलं आहे हे आपल्याला माहित आहे. आपण कोणाच्याही जीवावर मोठे झालेलो नाही. शिवसेना देशभर पोहचवायची आहे, असा कानमंत्रही आदित्य ठाकरेंनी दिला.

साहेबांचं एक वाक्य होतं 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण, पण आपण आता 150 टक्के समाजकारण आणि तितकेच टक्के राजकारण करत आहोत. आपण जे कार्य करतोय, त्या जनसेवेला आदित्य ठाकरेंनी सलाम केला.

सत्ता असताना आणि नसताना आपण जे काही करतो ते इतर कोणताही पक्ष करत नाही. शेतकरी, विद्यार्थी, रोजगार यासाठी शिवसेना काम करते. हाडामांसाचे शिवसैनिक आपल्या पक्षात आहेत, कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची आहे. बॉम्बस्फोट असो वा पूर, जात-धर्म न पाहता शिवसैनिक कठीण करताना रक्तदानाला उभा राहतो, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांचं कौतुक केलं.

राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम हे एकच हित आहे. एकच आवाज आहे जो कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत घुमतो. अमरनाथ यात्रा सुरु करण्यात साहेबांचा मोठा वाटा आहे, अशी आठवणही यावेळी आदित्य यांनी सांगितलं.