उल्हासनगर : पती-पत्नीचं भांडण मिटवायला पोलिस ठाण्यात आलेले दोन गटच परस्परांना भिडल्याचं उल्हासनगरमध्ये पाहायला मिळालं. पोलिसांसमोरच एकमेकांवर चाकू आणि तलवारी उगारणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.


विकास शिरसाठ आणि नेहा शिरसाठ या पती-पत्नीमध्ये वाद सुरु होते. हे वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावलं होतं.

महिला तक्रार निवारण कक्षात दोघांची बोलणी सुरु असतानाच अचानक पुन्हा वाद उफळला. दोघांसोबत आलेले आठ ते दहा जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. इतक्यावरच न थांबता त्यांनी चक्क एकमेकांवर चाकू आणि तलवारीही उगारल्या.

या प्रकारामुळे थबकलेल्या पोलिसांनी तात्काळ दोन्ही गटांना बाजूला केलं. अन्यथा पोलिस ठाण्यातच रक्ताचे पाट वाहिले असते.

या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी दोन्ही गटांच्या नऊ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन चाकू आणि तीन तलवारी जप्त केल्या आहेत.