Bandra Terminus Stampede : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत, यावरून आता विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं आहे, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


काय म्हणालेत आदित्य ठाकरे?


सोशल मिडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहलं आहे, "आपल्या 'रील'मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं. सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, परंतु दर आठवड्याला दर आठवड्याला काही ना काही घटना रेल्वे दुर्घटना आणि अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं, हे लज्जास्पद आहे."






संजय राऊतांचा हल्लाबोल


या घटनेबाबत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले, "मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून आणि रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आल्यापासून, देशात 25 हून अधिक मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. ज्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुम्ही बुलेट ट्रेन, मेट्रो आणि हायस्पीड ट्रेन्सबद्दल बोलत आहात आणि नितीन गडकरी हवेत बस चालवल्याबद्दल बोलतात पण, ज्याप्रकारे प्रवासी जखमी झालेत, याला रेल्वेमंत्री जबाबदार नाहीत का? मुंबईला लुटण्याचं काम सुरू आहे", अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे.






नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.


जखमी झालेल्या प्रवाशांची नावे :


शबीर अब्दुल रेहमान
परमेश्वर गुप्ता
रविंद्र छुमा
रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजापती
संजय कांगाय
दिव्यांशू यादव
मोहम्मद शेख
इंद्रजित शहानी
नूर शेख