मुंबई : सिनेमा चालण्याची खात्री नसली की, वादाची गरज भासते, अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी अप्रत्यक्षरित्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर निशाणा साधला. नाना पाटेकर त्यांच्या ‘आपला मानूस’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.


पद्मावतवरुन सुरु असलेल्या वादावर नाना काय म्हणाले?   

“मला वादाची गरज भासत नाही. आपला सिनेमा चालतोच. लोक बघणारच, याची खात्री असते. खात्री नसली की मग अशा गोष्टी कराव्या लागतात. मी संजय लीला भन्साळीला उघडपणे बोललो, की तुझ्याच सिनेमाबद्दल का वाद होतात? ‘क्रांतिवीर’च्या वेळीही वाद व्हायला काही हकत नव्हती. ‘26/11’ वेळीही वाद व्हायला हरकत नव्हती. पण का नाही झाली? कारण मुळात तुमचे हेतू साफ असतील, तर काहीच त्रास होत नाही.”, असे नाना म्हणाले.

वाद वगैरे करुन, घाणेरडी पब्लिसिटी करुन तुमचा सिनेमा चालत असेल, तर तो न चाललेलाच बरा. वाद मला नाही मान्य, असेही नाना म्हणाले.

राज ठाकरेंच्या टीकेवर काय म्हणाले नाना?

“मी फेरीवाल्यांबद्दल बोलल्यानंतर राज म्हणाला होता, त्याने चोमडेपणा करु नये. आता त्याने काय म्हणायचंय, ते मी नाही ना ठरवू शकत. पण मला काय वाटतं, ते मी सांगू शकतो की नाही? त्यामुळे मला जे वाटतं, ते मी बोलणार.”, असे राज ठाकरेंच्या टीकेवर बोलताना नाना म्हणाले.

त्यापुढे नाना म्हणाले, “राज ठाकरेंची प्रतिक्रिया आल्यानंतर मला वाईट वाटलं. ज्या मुलाला आपण असा पाहिलेला आहे, त्याने असा विपर्यास करायला नको होतं. त्याने त्यातली गोष्ट समजून घ्यायला हवी होती. पण त्याने त्याला जे सोईचं होतं, ते त्याने केलं.”

सोशल मीडियालाही सेन्सॉरशिप असावी : नाना

सेन्सॉरशिप असायला हवी. अन्यथा काही मंडळी अतिशय गलिच्छपणा करतील. तो होऊ नये. नाहीतर आपल्या भावना पटकन दुखावतात ना, असे मत नानांनी मांडले.

“समाजमाध्यमांवरही सेन्सॉरशिप असायला हवी. उद्या कुणाची बदनामी करायची झाल्यास, काहीतरी लिहून सोशल मीडियावरुन करु शकतो. आणि त्याला मग आपण काय करु शकतो? त्यामुळे स्वत:ला बंधनं घालून घ्यायला हवेत. नाहीतर किती जीव गेलेले आहेत, तुम्हाला माहिती आहेत.”, असेही ते म्हणाले.

पाहा संपूर्ण माझा कट्टा :