मुंबई : खड्ड्यांच्या प्रश्नावर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली आहे. मुंबईतले सर्वच रस्ते महापालिकेचे नसून, काही MMRDA आणि PWD चे सुद्धा आहेत. मात्र ते जबाबदारी झटकत असून, त्यांच्या रस्त्यावरील खड्डेही आम्हीच बुजवतोय, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात एबीपी माझाचे प्रतिनिधी वैभव परब यांनी महापौरांशी खास बातचित केली.


प्रश्न - कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे पाच बळी गेले आहेत, मुंबईत बळी जायची वाट बघायची का? 

महापौर : मुंबईत खड्डे बुजवण्याची प्रकिया सुरु झाली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये खड्डयांसाठी एक कंत्राटदार नेमला आहे. युद्धपातळीवर काम सुरु आहे. पण मुंबईत वेगवेगळी प्राधिकरणं आहेत. त्यांनीही खड्डे बुजवले पाहिजे.

प्रश्न - MMRDA आणि PWD खड्डे बुजवण्यात अपयशी ठरलं का?

महापौर - मी सातत्यानं मागणी करतोय की, MMRDA आणि PWD नी खड्डे बुजवावी. पण तसं होत नाहीय. पावसाळा आला तरी टेंडर काढू असंच बोलतात. मग मुंबईकरांची फसवणूक होते. रस्ते नेमके कोणाचे हे जनतेला माहित नसतं. सर्वांना वाटतं की सगळे रस्ते हे महापालिकेचे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने त्वरीत खड्डे बुजवावे.

प्रश्न – चंद्रकांत पाटील खड्ड्यांसाठी वेळ मागत आहेत?

महापौर - राज्य सरकारने जनतेला चांगले रस्ते द्यायला हवेत. मुंबईकरांना त्रास होता कामा नये. प्रत्येक विभागाने आपल्या हद्दीतले रस्ते बुजवले पाहिजेत.

प्रश्न - MMRDA आणि PWD ला विनंती करुनही खड्डे बुजवले जात नाहीत?

महापौर - आमची जबाबदारी नसतानाही आम्ही PWD चे रस्ते बुजवतोय. ही जबाबदारी आमची नाहीय. PWD ही जबाबदारी पार पाडत नाहीय. पण नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही खड्डे बुजवतोय.

प्रश्न - खड्ड्यांवरुन राजकारण सुरु झालं आहे? विरोधक खड्ड्यांवरुन आक्रमक झाले आहेत.

महापौर - राजकारण करणं विरोधकांचं काम आहे. काल सभागृहात चर्चा झाली आहे. सर्व पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. खड्ड्यांचा आढावा घेतला आहे. आम्ही कामाला सुरुवात केलीय.