ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. कासारवडवली येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव अनंत करमुसे आहे तो चाळीस वर्षांचा आहे. वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात अनोळखी व्यक्तींबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याने रविवारी रात्री फेसबुक आणि ट्विटरवर केलेल्या पोस्टचा राग आल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी घेतली आव्हाड हे समोर उभे होते असेही या तरुणाचे म्हणणे आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मला काहीही माहिती नाही आणि तर रात्री मी नेहमीप्रमाणे गाढ झोपेत असल्याचे म्हटले आहे. तसेच या तरुणावर त्यांनी प्रत्यारोप केला असून दाभोळकर पानसरे यांच्या हत्येत या तरुणाचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे.


काय आहे प्रकरण आणि पोस्ट


रविवारी पंतप्रधानांनी सर्व भारतीयांना दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याचा सर्वात पहिला विरोध हा जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र देशवासीयांनी भरभरून पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा दिल्याचे बघितल्यानंतर अनंत करमुसे या कासारवडवली येथे राहणार्‍या तरुणाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का, असा सवाल विचारण्यात आला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचे एक अश्लील चित्र देखील फेसबुकवर या तरूणाने पोस्ट केले होते. यानंतर या तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरी रात्री दोन पोलिस आले. त्यांनी पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे सांगितले आणि आपल्याला ते गाडीत बसवून थेट जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील 'नाद' बंगल्यावर घेऊन आले असे तरुणाचे म्हणणे आहे. हे पोलीस गणवेशात होते तसेच त्यांच्याकडे रिव्हॉल्वर देखील होते. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर आल्यानंतर त्याला सर्वप्रथम फायबर, लाकूड आणि लोखंडी काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी त्याची विचारपूस करून पोस्ट का केली यासंदर्भात त्याला प्रश्न विचारले. तरुणाच्या म्हणण्यानुसार प्रचंड मारहाण झालेली असताना त्याने आव्हाड यांची माफी मागितली आणि त्यांच्या सांगण्यावरून ती पोस्ट डिलीट केली. मात्र तरीही पुन्हा आव्हाड यांच्यासमोर त्याला मारहाण करण्यात आली असे तरुणाचे म्हणणे आहे. त्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना बोलावून या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र पोलिसांनी तरुणाची अवस्था बघून त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची तपासणी केली. यामध्ये त्याला जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तरुणाने अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मारहाणीचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी देखील या तरुणाच्या विरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी 'एबीपी माझा'ला दिलेली प्रतिक्रया


या सर्व प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही याबद्दल मला माहिती नाही. रात्री मी झोपलेला असतो. त्या दिवशी देखल मी दिवसभर माझ्या विभागात काम केल्यामुळे घरी येऊन झोपलो होतो, असे आव्हाड म्हणाले. तसेच या तरुणावर त्यांनी प्रत्यारोप केला आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर माझ्या घराची रेकी करण्यात आली होती. त्या रेकीच्या वेळी आणि दाभोळकर यांच्या खुनात प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्षपणे या तरुणाचा हात असल्याचा दाट संशय आहे. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली होती तशी पोस्ट कोण सहन करेल. माझा नग्न फोटो या मुलाने टाकला होता, असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? तसेच हे भाजपचे नेते तरी सहन करतील का? अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी 'एबीपी माझा' ला दिली आहे.


संबंधित बातम्या :



Coronavirus Vaccine | कॅडिला कंपनीने कोरोना लस बनवल्याचा दावा, प्राण्यांवर चाचणी सुरु