मुंबई: मुंबईसारख्या शहरात वीतभर रिकाम्या जागेची समस्या असताना, तब्बल 20 एकर जमीन वापराविना पडून आहे. त्याचं कारणही तसंच धक्कादायक आहे.


जुन्या, भंगार आणि महत्त्वाचं म्हणजे बेवारस गाड्यांमुळे मुंबईतील थोडीथोडकी नाही तर तब्बल 20 एकर जमीन व्यापली आहे. अशा जुन्या आणि भंगार गाड्यांची संख्या जवळपास 7 हजाराच्या घरात आहे.

मुंबई मनपाची आकडेवारी

मुंबई महापालिकेनेच याबाबतची आकडेवारी जारी केली आहे.

मुंबई महापालिकेने 1 जानेवारी 2016 ते 23 ऑगस्ट 2017 यादरम्यान रस्त्यावरील बेवारस गाड्यांची तपासणी केली. या जवळपास दीड वर्षाच्या काळात मुंबईत तब्बल 6 हजार 413 बेवारस गाड्या आढळल्या. या गाड्यांनी सुमारे 20 एकर जमीन व्यापली आहे.

महापालिकेने बेवारस आढळलेल्या गाड्यापैंकी 2,826 गाड्यांचा लिलाव केला आहे, तर उर्वरीत गाड्या गोडाऊनमध्ये ठेवल्या आहेत.

हे कमी की काय, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ऑक्टोबरमध्ये आणखी एक सर्व्हे केला. यावेळी आणखी 605 बेवारस गाड्या आढळून आल्या. त्यामुळे जवळपास 75 हजार चौरसफूट जागा व्यापला आहे.

बेवारस गाड्यांच्या तक्रारी

महापालिकेकडे सातत्याने बेवारस वाहनांबाबत तक्रारी येत होत्या. त्यावरुन महापालिकेने सर्व्हे केल्यानंतर, मुंबईतील पडीक जमीन आढळली.

याबाबत माहिती देताना सहाय्यक नगरपालिका आयुक्त मधुकर मगर म्हणाले, “बेवारस वाहनांवर नोटीस चिटकवून, अशी वाहनं 48 तासांच्या आत उचलली जातात. वाहनांवर दावा सांगण्यासाठी मालकांना 30 दिवसांचा अवधी दिला जातो. याकाळात गाड्या वरळी, अंधेरी आणि घाटकोपरमध्ये बीएमसीच्या स्क्रॅप गोडाऊनमध्ये ठेवल्या जातात”.

गाडीची लांबी-रुंदी आणि व्यापलेली जमीन

आरटीओच्या मते कोणतीही कार 7 बाय 16 = 124 स्वेअरफूट जागा व्यापते.

त्यानुसार 7 हजार गाड्यांचा हिशेब केला तर 70000 गुणिले 124 = 8 लाख 68 हजार स्क्वेअर फूट म्हणजेच जवळपास 20 एकर जमीन बेवारस गाड्यांनी व्यापली आहे.