कल्याण आणि कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली होती. रात्री पावणेबाराच्या सुमारास कुशीनगर एक्स्प्रेस कल्याणहून सुटल्यानंतर वालधुनी पुलाजवळ सात सशस्त्र लुटारुंनी जनरल डब्यात प्रवेश केला. कोयत्याच्या धाकावर त्यांनी गाडीतल्या प्रवाशांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटली. यानंतर कसारा रेल्वे स्थानक येताच हे सगळे गाडीतून उड्या मारून पळून गेले.
या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिसांनी तपास करत इगतपुरीहून सातपैकी सहा जणांना बेड्या ठोकल्या. सायमन पॅट्रिक मॅन्युएल उर्फ पापा, समीर मुश्ताक खान उर्फ बाबू, सजमुल सलीम सय्यद उर्फ तैफ, भूषण धोदमल उर्फ मन्या, किशोर गिरी आणि दीपक खरात अशी त्यांची नावं असून हे सगळे अवघ्या 19 वर्षांचे आहेत.
हे सगळे इगतपुरी रेल्वे स्थानकात फेरीवाल्याचा धंदा करतात. त्यांच्याकडून पोलिसांनी लुटमारीच्या वेळी वापरलेले कोयते, प्रवाशांकडून लुटलेले मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे. त्यांनी यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का? याचा तपास सध्या रेल्वे पोलीस करत आहेत.