ठाण्यात पावसाचा पहिला बळी, टँकरला धडकून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2018 05:03 PM (IST)
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर रस्ते अपघातात एका 22 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. प्रियांका झेंडे असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचं नाव आहे.
ठाणे : पावसाने ठाण्यात पहिला बळी घेतला आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर रस्ते अपघातात एका 22 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. प्रियांका झेंडे असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचं नाव आहे. ती लोकमान्यनगर भागात राहणारी आहे. प्रियांका ही तिची मैत्रीण संघवी बोकाडे हिच्यासोबत पावसाची मजा घेण्यासाठी घोडबंदर रोडवर दुचाकी घेऊन गेली होती. तिथून परतत असताना नागला चौकी भागात मुसळधार पावसामुळे गाडी चालवणाऱ्या संघवीला समोरचा टँकर दिसला नाही आणि गाडी घसरुन मागे बसलेली प्रियांका थेट टँकरखाली आली. तिच्या डोक्यावरून टँकरचं चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकी चालवणाऱ्या संघवीने हेल्मेट घातलेलं असल्यामुळे तिला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र मागे बसलेल्या प्रियांकाला आपला जीव गमवावा लागला. ठाण्यासह मुंबईत काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाण्यातील अनेक भागात पाणी तुंबलेलंही पाहायला मिळालं. रस्त्यावर पाणी साचलेलं असल्यामुळे वाहन चालवताना अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज आहे.