नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या पावसाची आस धरुन बसलेल्या जनतेला भारतीय हवामान विभागाने मोठा दिलासा दिला आहे. कारण यंदा पाऊसमान हे उत्तम म्हणजेच सरासरीच्या तब्बल 106 % असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


 

इतकंच नाही तर विदर्भ आणि दुष्काळी मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

कालच खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही देशभरात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

 

स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास सारखाच आहे.

 

स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून महिन्यात सरासरीच्या 90 टक्के, जुलै महिन्यात 105 टक्के, ऑगस्ट महिन्यात 108 टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 115 टक्के पाऊस पडणार आहे. एकूण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.