मुंबईः वरुणराजाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठीच थोडी निराशादायी बातमी आहे. केरळात मोठ्या धमाक्यात दाखल झालेला मान्सून मात्र महाराष्ट्राच्या वेशीवरच येऊन अडकून पडला आहे. त्यामुळे मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी सध्या पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

 

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांचा जोर सध्या ओसरला आहे, तसंच दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्याचं वेधशाळेने सांगितलं आहे.

 

मान्सून गेल्या 3 दिवसांपासून गोव्याच्या दक्षिण किनारपट्टीवर अडकला आहे. राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी वाऱ्याला गती मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत नाही, तोपर्यंत राज्याला मान्सूनची वाट पहावी लागणार आहे, असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.