मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला चार दिवस उलटून गेल्यानंतर अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होईल अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर पाचव्या दिवशी खातेवाटप होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.


या खातेवाटपाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. तसा संदेश त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना मिळाला असल्याची देखील माहिती आहे. या दरम्यान झालेल्या वाटाघाटीत काँग्रेसला बंदरे, खार जमिनी आणि सांस्कृतिक अशी तीन खाती देण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादीला माजी सैनिक कल्याण, क्रीडा व युवक कल्याण अशी दोन अतिरिक्त खाती देण्यात आली आहेत. तर कृषी आणि परिवहन खाते हे शिवसेनेकडे राहणार आहे.

दरम्यान याविषयी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं की, कोणती खाती कुणाला द्यायची याबाबत चर्चा राहिली होती. ती चर्चा आज पूर्ण झाली आहे. खातेवाटपाची अंतिम यादी आता तयार झाली आहे. यामध्ये पूर्ण समाधान करुनच यादी तयार केली आहे, असे पाटील यांनी दिली आहे. यामुळे उद्या सकाळी खातेवाटप होईल अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नव्या खात्याची निर्मिती करायच्या विचारात आहे. ही खाती शिवसेनेच्या मंत्र्यांना जाण्याची शक्यता आहे. मेट्रो रेल्वे, वाणिज्य, तीर्थक्षेत्रं विकास आणि मुख्यमंत्री कार्यालय ही चार नवीन खाती तयार होऊ शकतात. या खात्यांबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास, परिवहन, उद्योग, कृषी अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला महसूल, शालेय शिक्षण, उर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती आली आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला गृह, जलसंपदा, अर्थ अशी महत्त्वाची खाती आली आहेत.

तीन पक्षांच्या सरकारमध्ये खातेवाटप करताना प्रत्येक पक्षाला न्याय द्यायचा प्रयत्न झाला असला तरी पक्षातील नाराजीला वाचा फुटली आहे. शिवसेनेत ही नाराजी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यावर नवीन खाती तोडगा असतील, अशी चर्चा आहे.

यामध्ये मेट्रोशी संबंधित खातं बनवलं जाऊ शकतं. कारण सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रोची कामं सुरू आहेत. या निर्मितीदरम्यान प्रकल्पांसाठी एखादं खात असू शकेल.

तसंच व्यापाऱ्यांचं विशेषत: वस्तू आणि सेवा कर तसंच इतर करविषयक प्रश्न हाताळण्यासाठी वाणिज्य खाते बनवण्याचा विचार आहे. सोबतच राज्यात अनेक तीर्थक्षेत्रं असून अर्थसंकल्पात त्यांच्या विकासासाठी मोठी तरतूद केली जाते. त्यासाठी वेगळं खातं बनवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या कार्यालयातील कामकाज यासाठी विशेष मुख्यमंत्री कार्यालय खात देखील बनवले जाऊ शकतं, अशी देखील चर्चा आहे.

संबंधित बातम्या

खातेवाटपाचा तिढा सुटला, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेतील, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा 

Majha Vishesh | आणखी किती घोळ घालणार? | माझा विशेष | ABP MAJHA 

महसूल आणि कृषी खातं मिळवण्यासाठी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांमध्ये रस्सीखेच 

मंत्रालयातील नकोसं दालन; यात बसणाऱ्या मंत्र्यांच्या पदरी कायम निराशाच 

Ministry Distribution | उद्धव ठाकरे सरकारचा खातेवाटपाचा घोळ मिटेचिना...| ABP Majha