औरंगाबाद: औरंगाबादमध्ये उघड्या नाल्यांचा प्रश्न चिघळला आहे. उघड्या नाल्यात पडून सलग 2 दिवसात 2 नागरिकांच्या मृत्यूनंतर नागरिकांनी मनपा उपायुक्तांना मारहाण केली.


औरंगाबाद शहरातील जय भवानी नगर येथे नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा एन सिक्स परिसरात एकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. चेतन चोपडे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 38 वर्षांचे होते. चेतन बुलेट गाडीसह नाल्यात पडल्यानं ही दुर्घटना घडली.

चेतन चोपडे रात्री घराकडे जात होते. शहरात पावसाचा जोर वाढत होता, त्यामुळे त्यांना रस्ता आणि नाला यातील फरक कळला नाही आणि ते थेट नाल्यात जाऊन पडले.



काही वर्षांपूर्वी याच नाल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तरीदेखील महानगरपालिकेला कुठलेही शहाणपण सुचलं नाही. त्यामुळे महापालिका आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

दोन दिवसापूर्वी नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाला असतानाही, पालिकेने शहरातील उघड्या नाल्यांवर जाळी टाकण्याचं काम केलं नाही.  त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

VIDEO: