पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबले, वीज पडून चौघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 15 Apr 2018 07:04 PM (IST)
पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत चार जण जखमीही झाले आहेत. महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारातील ही घटना आहे.
यवतमाळ : अवकाळी पावसाने यवतमाळमध्ये चौघांचा जीव घेतला आहे. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत चार जण जखमीही झाले आहेत. महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारातील ही घटना आहे. मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील लातूरसह काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. तर विदर्भातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं प्रभाकर जाधव, पंडित हरणे, अनिल सरगुळे आणि लक्ष्मण चोपडे अशी आहेत. तर जितेंद्र सुरदूसे, विशाल सुरकळे आणि कैलास सुरो यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातही विविध ठिकाणी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.